वूलनचा जाड स्वेटर घातलेले विष्णू कडाक्याच्या थंडीमुळे हातावर हात घासताहेत... सीगारेटचा धूर सोडावा तसं तोंडाने गरम वाफ बाहेर सोडत... नारदा आपण हिमालयाच्या आसपास तर नाहीना ? केवढी रे ही थंडी.
नारद : काय ? मला निटसं ऐकू आलं नाही.
विष्णू : (चिडक्या स्वरात ) आधी ती कानाला लावलेली 10 रुपयांची कानपट्टी काढ बघू
नारद : (इअरफोनसारखी कानपट्टी काढत) देवा, हिमालय वगैरे काही नाही आपण अजून मुंबईतच आहोत. ही उत्तरेकडची लाट आहे असं म्हणतात...
विष्णू : अरे, मागे तर सांगत होतास उत्तरेकडून लोंढे येतात. लोंढ्यामुळे इथला मराठी माणूस "परेशान" आहे. आता ही लाट कसली ?
नारद : थंडीची ! देवा उत्तरेतून परप्रांतीयांच्या लोंढ्यासोबत आता थंडीच्या लाटाही येऊ लागल्यात...
विष्णू : काय रे, या लाटेबाबात कोणी काही बोलत कसे नाही...
नारद : "मनसे'वाले साहेब उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जातात. आता थंडीच मुंबईत आलीय त्यामुळे त्यांनी या परप्रांतीय थंडीबद्दल आंदोलनाचे फर्मान काढले नाही. परप्रांतीय थंडी इथे सहन केली जाणार नाही असा इशारा दिल्याचेही ऐकिवात नाही. विरोधकांची टीका सुरूच आहे.'मनसे'वाले गारठले म्हणून ... कॉंग्रेसचे नेहमीच वेलकम आणि शिवसेनासुद्धा शेकोट्या पेटवून परप्रांतीय थंडीच स्वागत करताहेत.
विष्णू : अरे बाबा, आवर स्वतः:ला. मी तुला विचारले काय ? आणि तू बडबडत काय सुटलास... मी विचारतो हवामान खातं काय म्हणतय ? लोकांची काय प्रतिक्रिया आहे.
नारद : लोक एकदम खूष ...थर्टी फस्टच्या मुहूर्तावर थंडी हजर झाल्याने मुंबईकर खूष आहेत.
तेवढ्यात एका ठिकाणी काही लोक शेकोटी पेटवून बसलेले दिसतात... त्यात मराठी माणसासह खांद्यावर गमछा टाकलेला भय्या, आणि लूंगीवाला अण्णा सारेच असतात... नारद आणि विष्णू दोघे त्यांना जॉईन करतात....
.................
