वाचक

View My Stats

Friday, January 29, 2010

मोबाईल वेड !

पृथ्वी भ्रमणावर आलेले विष्णू आणि नारद दोघेही चालू लागतात. विष्णू आज काहीसे अस्वस्थ आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजीचे भाव नारदाच्या नजरेतून सुटले नाहीत. "देवा काय झाले तुमची चर्या उतरलेली का ?', अशी चौकशी नारदाने एकदा करून पाहिली. पण त्यात यश काही आले नाही. भगवंताचे नक्की काय बिनसले असेल. मुंबईतले हे हेक्‍टीक लाइफ बघून उबग आली तर नाही ना ? तेवढ्यात एक मुलगी समोरून येताना दिसते. मान थोडीशी खाली करून हातवारे करीत हळू आवाजात बोलत बोलत त्यांच्या बाजूने निघून जाते. तिची काही निसटती वाक्‍ये दोघांच्या कानावर पडतं. " यु लव मी ना ! मग आपण आज भेटायचे नक्की. तू आला नाहीस तर बग मी तुझ्याशी कधी कधी म्हणजे कधीच बोलणार नाही' तेवढ्यात एक वेगवान गाडी तिच्या अगदी जवळून जोराने हॉर्न वाजवून निघून जाते. ती पुन्हा भानावर येते व बोलत बोलत चालू लागते. दोघेही तिच्याकडे आश्‍चर्याने पाहतात.


सुटाबुटातला एक गृहस्थ हातवारे करीत रागा रागाने बोलत होता. त्यांच्या चेहऱ्यावर संताप होता. बोलता बोलता त्याची समोरून येणाऱ्याशी धडक लागली. त्याने दोन शिव्या हासडल्या. कट्यावर बसलेला एक तरुण एकटाच खोखो हसत होता. त्याचे वेडेवाकडे हातवारे सुरू होते.एक सधू देखील साक्षात देवाशी संवाद साधत असल्याच्या आविर्भावात जाता दिसला.

विष्णू : नारदा हा काय प्रकार आहे ? या मर्त्य मानवाला झालेय तरी काय. मी इथे आल्यापासून पाहतो. चालताना, गाडी चालवताना सर्वत्र लोक असे वेड लागल्यागत का वागतायत.

नारद : देवा मानवाने एक असे यंत्र शोधून काढले आहे की त्याला आपल्यापासून हजारो योजने दूर असणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधता येतो. अगदी झटपट. भक्ती पंथाला लागलेले साधू संन्याशांनाही या यंत्राचा मोह आवरला नाही. मेनके पेक्षा भारी आहे हे यंत्र.

विष्णू : म्हणजे ती व्यक्त आपल्या समोर नसतानाही आपल्याला तिचा आवाज येऊ शकतो.

नारद : हो देवा बरोबर. त्या वस्तूला भ्रमणध्वनी असे म्हणतात.

विष्णू : अरे पण मला तर त्यांच्या हातात असले कोणते यंत्र दिसले नाही बुवा

नारद : देवा त्यांच्या कानात तुम्हाला काही तरी दिले ना. त्याला "इयरफोन' म्हणतात. म्हणजे ते त्या भ्रमणध्वनीशी जोडलेले असतात. त्यामुळे हात मोकळे ठेवून बोलता बोलता इतर कामेही करता येतात.

विष्णू : सुंदर अति सुंदर ! या मानवाच्या बुद्धीची तारीफ करावी तेवढी कमी. पण नारदा मला एक धोका जाणवतो. भ्रमणध्वनीवर असे कुठेही आणि कसले भान न बाळगता बोलणे धोकादायक आहे. अशा ने अपघात होऊ शकतो. असे लोक अपघाताला कारणीभूत ठरू शकतात. तेव्हा या चांगल्या गोष्टीचा योग्य आणि काळजीपूर्वक वापर करावयास हवा.

(तेवढ्यात मोबाईलचे एक दुकान दिसते.विष्णूची पावले दुकानाकडे वळतात. दोघेही तीन मोबाईल खरेदी करून बाहेर येतात. तेव्हा विष्णूचा चेहरा खुललेला असतो. नारदाला देवाच्या नाराजीचं कारण आता उमगतं लक्ष्मीच्या आठवणीनं व्याकूळ झाले विष्णू लक्ष्मीला कॉल करतात.)