वाचक

View My Stats

Tuesday, September 1, 2009

भक्तीच ओंगळ रूप...


गवान विष्णू नारदाला सोबत घेऊन पृथ्वीच्या दौऱ्यावर निघाले आहेत. विष्णू आता पृथ्वीवरून परत केव्हा येतील याचा नेम नसल्याने नाराजीनंच लक्ष्मी त्यांच्या प्रवासाची तयारी करीत होती. तेवढ्यात पार्वती घाईघाईत प्रवेश करतात. विष्णूला प्रणाम करीत त्या हातातला मोदकाचा डबा पुढे करून "येवढा माझ्या गणेशाला द्या', असे आवर्जून सांगता. लवकरच परत येतो अशी लक्ष्मीची समजूत घालून विष्णू व नारदाने पृथ्वीच्या दिशेने कूच केली...

दोघेही चंद्रा जवळून जात असताना अचानक एक वेगवान वस्तू त्यांच्या जवळून निघून जाते. दोघे ही दचकून त्या दिशेने पाहत राहतात...

विष्णू : नारदा पाहिलंस काही तरी वेगाने निघून गेले. काय होते ते ?

नारद : देवा कदाचित ते भारताचे चंद्रयान असावे

विष्णू : चंद्रयान !

नारद : हो ! हल्ली माणसं अशी यानं पाठवून विश्‍वात आपल्या कोणी सोबती आहे काय याचा शोध घेत असतात. अशी अनेक यान निकामी होऊन मग अंतराळात फिरतात. येथेही नुसता कचरा झालाय पृथ्वीसारखा.
(दोघंही पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतात. प्रथम मुंबईत उतरतात, दोघंही सामान्य माणसाचा वेश धारण करून दृष्य स्वरूपात वावरू लागतात. )

विष्णू : अरे आपले एक महत्त्वाचे काम आधी करू. बाळ गणेशाला हे मोदक आधी पोहचते करू मग निवांतपणे फिरू (दोघेही लालबागला येतात.) कसली ही केवढी गर्दी आणि या लांबच लांब रांगा

नारद : देवा आपल्या गणेशाची भक्त मंडळी आहेत सारी. इथला गणपती नवसाला पावतो अशी यांची श्रद्धा आहे म्हणे.

विष्णू : त्या शेजारच्या गल्लीतील असणाऱ्या गणपतीकडे कोणीच जात नाहीय... हा काय प्रकार आहे. अरे आमची रूपे सारी एकच असताना. ही माणसं अशी का वागतात... आणि त्या मूर्तीच्या गळ्यात नोटांचे हार कशाला, सोनं, नाणं दान म्हणून का देतात. माला काहीच काळत नाही... आपल्या गणेशाला मोदक आणि दूर्वा सोडून हे कधी पासून आवडायला लागले.

नारद : देवा ! गणेशाच्या आवडी त्याच आहेत. पण या माणसांना ते कळत नाहीय. त्यांच्या मनाचे हे सागळे खेळ आहेत. देव भक्तीचा भुकेला हे तो विसरून गेलाय. देव म्हणजे त्याला हव्यासी राजकीय नेता वाटला की काय देणग्या देऊन व घेऊन खूष होणारा. काही गर्भ श्रीमंत लोक लाखो रुपयांच्या देणग्या देतात पण गोर गरिबांना मदत करीत नाहीत...

विष्णू : ती गर्दी बघ... लोक कशी घूसाघूशी करतायत...दोन- दोन दिवसांपासून रांगेत आहेत म्हणे ते... अरे बाजूला बसलेल्या गणपतीकडं जायलाच ते तयार नाहीत. इथला आणि तिथला गणपती कधी वेगळा असते का ? कोण सांगणार हे यांना... खरच मी विटलो हे पाहून.

नारद : देवा असं पहिल्याच भेटीत खचून जाऊ नका आणखी बरंच काही आपल्याला पहायचे आहे.

तेवढ्यात मागून एक हवालदार शिट्टी मारत काठी उगारत खेकसतो 'ये चाला लायनीत व्हा...' दोघेही या प्रकाराने घाबरतात आणि तत्काळ अंतर्धान पावतात...

...........

विष्णू आणि नारद पृथ्वीच्या दौऱ्यावर...

पृथ्वीवर सध्या बरीच सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र अनेक घडामोडींची इत्थंभूत माहिती भगवान विष्णूपर्यंत पोहचत नाही त्यामुळे ते सध्या फारच अस्वस्थ झाले आहेत. याच विषयावरून त्यांनी नारदांना नुकतेच फैलावर घेतले. लक्ष्मीनेही नारदाबाबत तक्रार केल्याने विष्णू अधिकच संतापले होते. 24 तास न्यूज चॅनेल पाहूनही विष्णूला आवश्‍यक ती माहिती मिळत नाहीय. त्यामुळे अखेर पृथ्वीवर जाऊन स्वतः:च माहिती घेण्याचे मनाशी ठरवून विष्णूंनी नारदाला सोबत घेऊन पृथ्वीवर येण्याचे ठरवले. विष्णू आणि नारद कधी अदृश्‍यपणे तर कधी वेश पालटून सर्व गोष्टींचा मागोवा घेणार आहेत...
(विष्णू आणि नारद यांच्या या गुप्त दौऱ्याची खबर मात्र आम्हाला सूत्रांकडून मिळाली असून त्यांच्या हलचालीची खडनखडा माहिती आम्ही वाचकांना या ब्लॉगवरून "विष्णू -नारद ' या सदरातून वेळोवेळी देत राहू जसजशी खबर मिळेल तशी वाचकांना कळवत राहू... तोपर्यंत आम्ही प्ले करतो आहोत हे एक आपल्या आवडीचे गाणे... )