वाचक

View My Stats

Saturday, June 11, 2011

घरी नेऊन पार्क कर

रेल्वेच्या डब्यात किंवा बसमध्ये खिडकीजवळची जागा पटकाविण्यासाठी प्रवाशांमध्ये नेहमीच चढाओढ लागते. जागा अडविण्याच्या स्पर्धेत मग भांडणेही जुंपतात. परवाचीच घटना सीएसटीहून अंबरनाथला जाणाऱ्या रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी नसतानाही झुंबड उडाली (सवयीप्रमाणे). एका प्रवाशाने गाडी प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर खिडकीतून रुमाल टाकून जागा अडवून ठेवली, मात्र गाडीत चढल्यावर दुसऱ्याच प्रवाशाने ती जागा पटकाविली. त्यामुळे दोघेही त्या जागेवर आपला दावा सांगू लागले. मग दोघांत जोरदार बाचाबाची सुरू झाली, हमरीतुमरीवरून प्रकरण गुद्द्यावर आले. दोघेही एकमेकांच्या आई-बहिणींचा उद्धार करीत मनसोक्त शिव्या हासडीत होते. गाडीतील सारे प्रवासी त्यांचा हा "तमाशा' गंभीरपणे पाहत होते. आता एकमेकांची डोकी फुटणारच, असे वाटत असताना काही प्रवाशांनी मध्यस्थी करून दोघांना शांत केले, मात्र तरीही त्यांच्यात शाब्दिक युद्ध सुरूच होते. "तुझ्या बापाची गाडी आहे काय? गाडी विकत घेतलीय काय तुझ्या बापाने...?' असे त्यातील एकाने सुनावले. त्यावर चवताळलेल्या दुसऱ्याने त्याला तत्काळ प्रत्युत्तर दिलं. "अरे जारे... माझ्या बापाची गाडी नाही, पण तुझ्या बापाने खरेदी केली असेल, तर घरी नेऊन पार्क कर जा,' असे म्हणताच येवढा वेळ दोघांचे भांडण गांभीर्याने पाहणाऱ्या प्रवाशांच्या हास्याचा बांध फुटला आणि सारे खो-खो हसू लागलं. गाडीतील वातावरण क्षणार्धात बदललं. त्यामुळे खजील झालेल्या एका भांडखोराने पुढच्या स्टेशनला गाडी सोडली की हो...
- योगेश पवार

ये रे घना ये रे घना...

 माझ्या घराच्या खिडकीतून तो वाऱ्याबरोबर आत शिरतो म्हणून मी कधिचा खिडकीला प्लास्टिकचा कागद लावून ठेवला. आमच्या घराशेजारील दत्ताच्या मंदिरातही तो असाच अवचित घुसतो आणि जलाभिषेक करून जातो. दरवर्षीचा त्याचा हा नित्यक्रम. म्हणून पुजाऱ्यानेही त्या जागेवर मेन कापड लावून ठेवलेय. तू असा, साऱ्यांना त्रास देतोस खरा पण तू अगदी अवचित पावलांनी यावं आणि आमच्यासह झाडं, वेली, प्राणी अगदी सिमेंटच्या इमारतींनाही चिंब भिजवून टाकावेस असं वाटतं. म्हणूनच तुझी आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहतोय. होय अगदी अधीर झाले आहेत आम्ही तुझ्या आगमनासाठी. तू केव्हा येतोस? त्या वेध शाळेवाल्यांनी तुझ्या आगमनाची वर्दी दिलीय पण तू तुझ्या सवयीप्रमाणे त्यांना हुलकावणी दिलीसच. वेधशाळेला चकविण्यात आणि त्यांची हुर्ये उडविण्यात तुझा हातखंडाच आहे म्हणा. असो पण तुझं काय झालंय ? का रुसला आहेस ? गेले काही वर्षे अगदी मे महिन्याच्या 25 तारखेपर्यंत अचानक हजर व्हायचास. आणि बेसावध असणाऱ्या नवरा, नवरीला मांडवात लग्न लागत असतानाच चिंब भिजवून काढायचा. पाऊस आला पाऊस आला म्हणत मग व्हराडाची एकच धावपळ उडायची. लोक तुझ्या नावाने बोटं मोडत. पण दुसरीकडे भीषण पाणी टंचाईने होरपळलेले असल्याने तुझ्या आगमनासरशी ते सुखावून जात. त्यांचा तो राग अगदीच लटका आणि तात्पुरता असायचा. ते तुलाही माहीत आहे. मग तू का रागावलायस ? अजून तुझा साधा शिडकावाही नाही किंवा तुझ्या येण्याची खबर देणारा वळीवाचा पाऊसही आला नाही. काय चुकले आमचे? आम्ही निसर्गावर केलेल्या आक्रमणाची शिक्षा तू आम्हाला देतोस? कदाचित तसेच असेल. आम्ही बेभान झालोय. निसर्गाच्या चक्रातील आम्ही एक़ इवलासा घटक आहोत हे विसरलो आहोत. बुद्धीच्या जोरावर निसर्गचक्रात ढवळाढवळ करून ते बिघडविण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच कदाचित सारे विस्कळित झाले असावे. माफ कर आम्हाला. तू खरच आता धुवाधार बरस. फार अंत पाहू नको रे आमचा. गोठ्यातील जनावरेही पाठीवर तुषारांचा शिडकावा व्हावा म्हणून आसुसली आहेत. एव्हाना "जोत' शेतात फिरत असते. शेतकरी कुटुंबासह क्षणभर विश्रांतीसाठी बांधावर बसून भाकरीचा तुकडा मोडायचा. पण हे सारे थांबलेय तुझ्यासाठी . गावातील घरांना गवताची झडी बांधून पूर्ण झाली आहे. पावसाळी जळणासाठी लागणारे सर्पन घरात भरून झालेय. शेतमळ्या स्वच्छ करून झाल्या आहेत. विहिरीचा कोरडा तळ साफ करून ठेवला आहे. तुझ्या आगमनाने काळ्या कातळाला पाझर फुटेल. विहीर काठोकाठ भरून जाईल. खरं म्हणजे एव्हाना ती भरायला हवी होती. पण तू रुसला आहेस ना. विहिरीच्या काठच वडाच भलं मोठं झाड आणि त्यावर बसणारे पक्षी चातकाप्रमाणे तुझी आळवणी करीत आहेत. त्यांची तरी किमान पर्वा कर. ंबईत तू कोसळलास की, जागो जागी पाणी तुंबत. रेल्वे रस्ते जाम होतात. अशा वेळी तुझी चीड येते. पण खरं सांगू ती तेवढ्यापुरतीच. म्हणूनच 26 जुलैच्या भयंकर प्रलयानंतरही मुंबईकर तुझी तेवढ्याच आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. अगदी सिमेंटच्या इमरतींही क्षणभर शिडकाव्यासाठी कासावीस झाल्या आहेत. मग कधी येतोस...
.....योगेश पवार

निसर्गाच्या कुशीतला इतिहास


स्वराज्यावर चाल करून येणाऱ्या गनिमाच्या उरात त्याने एकेकाळी धडकी भरवली. श्रीमान योगी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने तो पावन झाला अन्‌ मराठी मुलखाची राजधानी म्हणून मिरवला. शिवछत्रपतींच्या झंझावाती युगाचा एक साक्षीदार म्हणून रायगडची ओळख. दुसरं काश्‍मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य कोकणच्या कुशीत वसलेल्या या गडाला इतिहासाबरोबर निसर्गाचंही लेणं लाभलं. निसर्गानं सौंदर्याची त्याच्यावर मुक्त हस्ते उधळण केली आहे. निसर्गाच्या आभूषणांनी नटलेला ओला, हिरवा रायगड सध्या पर्यटक आणि गिर्यारोहकांना साद घालतो आहे.पावसाचा मनमुराद आनंद घेत, त्या शनिवारी आम्ही मित्रांनी रायगडाकडे कूच केली. भल्या पहाटे साडेचार वाजता आम्ही पाचाड खिंड ओलांडून रायगडाच्या पायथ्याशी चित्त दरवाजाजवळ पोचलो. वाटेत निसर्गसौंदर्याचा अद्वितीय नजारा... धरतीचा निरोप घेणारी रात्र जागोजागी धुक्‍यात रेंगाळत होती. त्या अस्पष्ट उजेडातून हळूहळू डांबरी सडक स्पष्ट होत होती. सडकेलगत झाडावरील पानांच्या शेंड्यांतून, सुकलेल्या काटक्‍यांच्या टोकातून निथळणारं दव. दवाच्या थेंबांतून आरपार जाणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या किरणांमुळे दवाचे मोती बनले. निसर्गाचा हा अचंबित करणारा चमत्कार पाहून रात्रभर प्रवासानं आलेला थकवा कुठल्या कुठे पळाला. आम्ही एकदम फ्रेश झालो. रायगडापासून 22 किलोमीटरवर निसर्गानं आमचं असं जबरदस्त स्वागत केलं. वाटेत लागणाऱ्या खेडेगावांचा, लाल कौलारू घरांचा निरोप घेत जसजसे आम्ही रायगडाकडे जाऊ लागलो, तसतशी ती घरं लहान होत गेली. मध्येच येणाऱ्या धुक्‍याच्या लाटांनी ती कधी कधी पूर्णपणे अदृश्‍य होत. आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचलो, तेव्हा तर धुकं आणि छत्रपतींच्या रक्षणासाठी छातीचा कोट करणाऱ्या सह्य पर्वताच्या काळ्या पाषाणांचा लपंडाव सुरू होता. धुक्‍याचं पांघरूण झुगारून काही डोंगरमाथे आळोखेपिळोखे देत "उठतो' म्हणत. पण पाच मिनिटं हं.. असं लहान मुलासारखं म्हणून पुन्हा धुक्‍याच्या चादरीत तोंड खुपसून मुरी मारून झोपत. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी आणि डोंगरांना जागो... जागो म्हणत झंझावाती समाचार घेणारे वासुदेवाच्या भूमिकेतले धुक्‍याचे लोळ, सारंच नयनरम्य. शब्दबद्ध न होणारं. धुक्‍याचा हा ढग असा काही बेभानपणे सैर करीत होता, की बघता बघता तो डोक्‍यावरून निघून जात होता आणि मग लक्षात येत होतं, अरे, आपल्या केसांवर, कपड्यांवर दव सांडलंय अन्‌ फुटावरच्या अंतरावरचंही काही दिसत नाहीय. काही क्षणांपूर्वी स्पष्ट दिसणारी कौलारू घरं आणि डोंगरांचे शेंडे धुक्‍यात हरवून जात.
अफझलखानाच्या स्वारीपूर्वी इ.स. 17 व्या शतकात शिवरायांनी रायरीचा किल्ला यशवंतराव मोरे यांच्याकडून जिंकून घेतला. किल्ल्याचं बांधकाम मोरोपंत पिंगळे यांनी केलं. दोन हजार 700 फूट उंचीवर काळ्या कातळांचा हा किल्ला वसला आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी राजधानी म्हणून हा किल्ला छत्रपतींनी चाणाक्षपणे हेरला. "दीड गाव उंच - देवगिरीहून दशगिरीहून दशगुणी उंच जागा, पर्ज्यन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही हे पाहून महाराज म्हणाले, "तख्तास जागा हाच गड करावा' असा बखरीत उल्लेख सापडतो. गडावर चढाई करताना रायगडच्या या वैशिष्ट्यांचा प्रत्यय पावलोपावली येतो. पावसामुळे निसरड्या झालेल्या पायवाटेनं गड चढावा लागतो. डोंगराच्या भल्यामोठ्या कातळी पोटावरून कोसळणारे स्वच्छ, निर्मळ पाण्याचे धबधबे वाटेत भेटतात; तर कुठे कातळाला पाझर फुटून नुसतंच पाणी ठिबकत असतं. वाटेतच धुक्‍याच्या ढगाआडून पाऊस अचानक चाल करून येतो, तेव्हा चांगलीच गाळण उडते. समोरचा रस्ता दिसेनासा होतो. सोसाट्याचा वारा सुटलेला असतो. वाऱ्याच्या झंझावाताने तोल जाऊन शेकडो फूट दरीत कोसळण्याची भीती असते.गडावर पोचलं, की दृष्टीस पडतो हिरवाकंच शालू नसलेली तांबडी माती आणि नागमोडी पायवाट, काळ्या दगडांनी केलेलं बांधकाम. "अदभुत!' असेच शब्द मुखातून बाहेर पडतात. "खूब लढा बुरूज', "दोन- नाणे' (नाना) दरवाजा, गंगासागर, टकमक टोक, नगारखाना, राण्यांचे महाल, अष्टप्रधान मंडळाची जागा, राजदरबारातील उठबस असणाऱ्या व्यक्तींसाठी असलेला "मीना दरवाजा', महादरवाजा, जगदीश्‍वराचं मंदिर हे सारं पाहिलं, की शिवकालीन देदीप्यमान इतिहासाची पानं डोळ्यांसमोरून झपाझप उलटतात. भोवळ आणणारा हिरकणी कडा पाहिला, की त्या माऊलीच्या धाडसानं मन थक्क होतं. महाराजांचा दरबार आणि त्यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा पाहिला, की छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा कल्पनेनं नजरेसमोर उभा राहतो अन्‌ ऊर अभिमानानं भरून येतो. गडावर फिरताना पावलोपावली भग्न अवशेषांना, दगडांनाही शब्द फुटतात अन्‌ ते शिवरायांची विजयगाथा सांगतात. इतिहास बोलका होतो. शिवराय आज नसले तरी त्यांचं स्थान एकविसाव्या शतकातही प्रत्येकाच्या हदयात कोरलेलं आहे. म्हणूनच अजूनही ऊन-पावसातही मराठी मनं रायगडाची वाट तुडवीतच असतात...
- योगेश पवार