वाचक

View My Stats

Saturday, June 11, 2011

घरी नेऊन पार्क कर

रेल्वेच्या डब्यात किंवा बसमध्ये खिडकीजवळची जागा पटकाविण्यासाठी प्रवाशांमध्ये नेहमीच चढाओढ लागते. जागा अडविण्याच्या स्पर्धेत मग भांडणेही जुंपतात. परवाचीच घटना सीएसटीहून अंबरनाथला जाणाऱ्या रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी नसतानाही झुंबड उडाली (सवयीप्रमाणे). एका प्रवाशाने गाडी प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर खिडकीतून रुमाल टाकून जागा अडवून ठेवली, मात्र गाडीत चढल्यावर दुसऱ्याच प्रवाशाने ती जागा पटकाविली. त्यामुळे दोघेही त्या जागेवर आपला दावा सांगू लागले. मग दोघांत जोरदार बाचाबाची सुरू झाली, हमरीतुमरीवरून प्रकरण गुद्द्यावर आले. दोघेही एकमेकांच्या आई-बहिणींचा उद्धार करीत मनसोक्त शिव्या हासडीत होते. गाडीतील सारे प्रवासी त्यांचा हा "तमाशा' गंभीरपणे पाहत होते. आता एकमेकांची डोकी फुटणारच, असे वाटत असताना काही प्रवाशांनी मध्यस्थी करून दोघांना शांत केले, मात्र तरीही त्यांच्यात शाब्दिक युद्ध सुरूच होते. "तुझ्या बापाची गाडी आहे काय? गाडी विकत घेतलीय काय तुझ्या बापाने...?' असे त्यातील एकाने सुनावले. त्यावर चवताळलेल्या दुसऱ्याने त्याला तत्काळ प्रत्युत्तर दिलं. "अरे जारे... माझ्या बापाची गाडी नाही, पण तुझ्या बापाने खरेदी केली असेल, तर घरी नेऊन पार्क कर जा,' असे म्हणताच येवढा वेळ दोघांचे भांडण गांभीर्याने पाहणाऱ्या प्रवाशांच्या हास्याचा बांध फुटला आणि सारे खो-खो हसू लागलं. गाडीतील वातावरण क्षणार्धात बदललं. त्यामुळे खजील झालेल्या एका भांडखोराने पुढच्या स्टेशनला गाडी सोडली की हो...
- योगेश पवार

ये रे घना ये रे घना...

 माझ्या घराच्या खिडकीतून तो वाऱ्याबरोबर आत शिरतो म्हणून मी कधिचा खिडकीला प्लास्टिकचा कागद लावून ठेवला. आमच्या घराशेजारील दत्ताच्या मंदिरातही तो असाच अवचित घुसतो आणि जलाभिषेक करून जातो. दरवर्षीचा त्याचा हा नित्यक्रम. म्हणून पुजाऱ्यानेही त्या जागेवर मेन कापड लावून ठेवलेय. तू असा, साऱ्यांना त्रास देतोस खरा पण तू अगदी अवचित पावलांनी यावं आणि आमच्यासह झाडं, वेली, प्राणी अगदी सिमेंटच्या इमारतींनाही चिंब भिजवून टाकावेस असं वाटतं. म्हणूनच तुझी आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहतोय. होय अगदी अधीर झाले आहेत आम्ही तुझ्या आगमनासाठी. तू केव्हा येतोस? त्या वेध शाळेवाल्यांनी तुझ्या आगमनाची वर्दी दिलीय पण तू तुझ्या सवयीप्रमाणे त्यांना हुलकावणी दिलीसच. वेधशाळेला चकविण्यात आणि त्यांची हुर्ये उडविण्यात तुझा हातखंडाच आहे म्हणा. असो पण तुझं काय झालंय ? का रुसला आहेस ? गेले काही वर्षे अगदी मे महिन्याच्या 25 तारखेपर्यंत अचानक हजर व्हायचास. आणि बेसावध असणाऱ्या नवरा, नवरीला मांडवात लग्न लागत असतानाच चिंब भिजवून काढायचा. पाऊस आला पाऊस आला म्हणत मग व्हराडाची एकच धावपळ उडायची. लोक तुझ्या नावाने बोटं मोडत. पण दुसरीकडे भीषण पाणी टंचाईने होरपळलेले असल्याने तुझ्या आगमनासरशी ते सुखावून जात. त्यांचा तो राग अगदीच लटका आणि तात्पुरता असायचा. ते तुलाही माहीत आहे. मग तू का रागावलायस ? अजून तुझा साधा शिडकावाही नाही किंवा तुझ्या येण्याची खबर देणारा वळीवाचा पाऊसही आला नाही. काय चुकले आमचे? आम्ही निसर्गावर केलेल्या आक्रमणाची शिक्षा तू आम्हाला देतोस? कदाचित तसेच असेल. आम्ही बेभान झालोय. निसर्गाच्या चक्रातील आम्ही एक़ इवलासा घटक आहोत हे विसरलो आहोत. बुद्धीच्या जोरावर निसर्गचक्रात ढवळाढवळ करून ते बिघडविण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच कदाचित सारे विस्कळित झाले असावे. माफ कर आम्हाला. तू खरच आता धुवाधार बरस. फार अंत पाहू नको रे आमचा. गोठ्यातील जनावरेही पाठीवर तुषारांचा शिडकावा व्हावा म्हणून आसुसली आहेत. एव्हाना "जोत' शेतात फिरत असते. शेतकरी कुटुंबासह क्षणभर विश्रांतीसाठी बांधावर बसून भाकरीचा तुकडा मोडायचा. पण हे सारे थांबलेय तुझ्यासाठी . गावातील घरांना गवताची झडी बांधून पूर्ण झाली आहे. पावसाळी जळणासाठी लागणारे सर्पन घरात भरून झालेय. शेतमळ्या स्वच्छ करून झाल्या आहेत. विहिरीचा कोरडा तळ साफ करून ठेवला आहे. तुझ्या आगमनाने काळ्या कातळाला पाझर फुटेल. विहीर काठोकाठ भरून जाईल. खरं म्हणजे एव्हाना ती भरायला हवी होती. पण तू रुसला आहेस ना. विहिरीच्या काठच वडाच भलं मोठं झाड आणि त्यावर बसणारे पक्षी चातकाप्रमाणे तुझी आळवणी करीत आहेत. त्यांची तरी किमान पर्वा कर. ंबईत तू कोसळलास की, जागो जागी पाणी तुंबत. रेल्वे रस्ते जाम होतात. अशा वेळी तुझी चीड येते. पण खरं सांगू ती तेवढ्यापुरतीच. म्हणूनच 26 जुलैच्या भयंकर प्रलयानंतरही मुंबईकर तुझी तेवढ्याच आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. अगदी सिमेंटच्या इमरतींही क्षणभर शिडकाव्यासाठी कासावीस झाल्या आहेत. मग कधी येतोस...
.....योगेश पवार

निसर्गाच्या कुशीतला इतिहास


स्वराज्यावर चाल करून येणाऱ्या गनिमाच्या उरात त्याने एकेकाळी धडकी भरवली. श्रीमान योगी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने तो पावन झाला अन्‌ मराठी मुलखाची राजधानी म्हणून मिरवला. शिवछत्रपतींच्या झंझावाती युगाचा एक साक्षीदार म्हणून रायगडची ओळख. दुसरं काश्‍मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य कोकणच्या कुशीत वसलेल्या या गडाला इतिहासाबरोबर निसर्गाचंही लेणं लाभलं. निसर्गानं सौंदर्याची त्याच्यावर मुक्त हस्ते उधळण केली आहे. निसर्गाच्या आभूषणांनी नटलेला ओला, हिरवा रायगड सध्या पर्यटक आणि गिर्यारोहकांना साद घालतो आहे.पावसाचा मनमुराद आनंद घेत, त्या शनिवारी आम्ही मित्रांनी रायगडाकडे कूच केली. भल्या पहाटे साडेचार वाजता आम्ही पाचाड खिंड ओलांडून रायगडाच्या पायथ्याशी चित्त दरवाजाजवळ पोचलो. वाटेत निसर्गसौंदर्याचा अद्वितीय नजारा... धरतीचा निरोप घेणारी रात्र जागोजागी धुक्‍यात रेंगाळत होती. त्या अस्पष्ट उजेडातून हळूहळू डांबरी सडक स्पष्ट होत होती. सडकेलगत झाडावरील पानांच्या शेंड्यांतून, सुकलेल्या काटक्‍यांच्या टोकातून निथळणारं दव. दवाच्या थेंबांतून आरपार जाणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या किरणांमुळे दवाचे मोती बनले. निसर्गाचा हा अचंबित करणारा चमत्कार पाहून रात्रभर प्रवासानं आलेला थकवा कुठल्या कुठे पळाला. आम्ही एकदम फ्रेश झालो. रायगडापासून 22 किलोमीटरवर निसर्गानं आमचं असं जबरदस्त स्वागत केलं. वाटेत लागणाऱ्या खेडेगावांचा, लाल कौलारू घरांचा निरोप घेत जसजसे आम्ही रायगडाकडे जाऊ लागलो, तसतशी ती घरं लहान होत गेली. मध्येच येणाऱ्या धुक्‍याच्या लाटांनी ती कधी कधी पूर्णपणे अदृश्‍य होत. आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचलो, तेव्हा तर धुकं आणि छत्रपतींच्या रक्षणासाठी छातीचा कोट करणाऱ्या सह्य पर्वताच्या काळ्या पाषाणांचा लपंडाव सुरू होता. धुक्‍याचं पांघरूण झुगारून काही डोंगरमाथे आळोखेपिळोखे देत "उठतो' म्हणत. पण पाच मिनिटं हं.. असं लहान मुलासारखं म्हणून पुन्हा धुक्‍याच्या चादरीत तोंड खुपसून मुरी मारून झोपत. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी आणि डोंगरांना जागो... जागो म्हणत झंझावाती समाचार घेणारे वासुदेवाच्या भूमिकेतले धुक्‍याचे लोळ, सारंच नयनरम्य. शब्दबद्ध न होणारं. धुक्‍याचा हा ढग असा काही बेभानपणे सैर करीत होता, की बघता बघता तो डोक्‍यावरून निघून जात होता आणि मग लक्षात येत होतं, अरे, आपल्या केसांवर, कपड्यांवर दव सांडलंय अन्‌ फुटावरच्या अंतरावरचंही काही दिसत नाहीय. काही क्षणांपूर्वी स्पष्ट दिसणारी कौलारू घरं आणि डोंगरांचे शेंडे धुक्‍यात हरवून जात.
अफझलखानाच्या स्वारीपूर्वी इ.स. 17 व्या शतकात शिवरायांनी रायरीचा किल्ला यशवंतराव मोरे यांच्याकडून जिंकून घेतला. किल्ल्याचं बांधकाम मोरोपंत पिंगळे यांनी केलं. दोन हजार 700 फूट उंचीवर काळ्या कातळांचा हा किल्ला वसला आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी राजधानी म्हणून हा किल्ला छत्रपतींनी चाणाक्षपणे हेरला. "दीड गाव उंच - देवगिरीहून दशगिरीहून दशगुणी उंच जागा, पर्ज्यन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही हे पाहून महाराज म्हणाले, "तख्तास जागा हाच गड करावा' असा बखरीत उल्लेख सापडतो. गडावर चढाई करताना रायगडच्या या वैशिष्ट्यांचा प्रत्यय पावलोपावली येतो. पावसामुळे निसरड्या झालेल्या पायवाटेनं गड चढावा लागतो. डोंगराच्या भल्यामोठ्या कातळी पोटावरून कोसळणारे स्वच्छ, निर्मळ पाण्याचे धबधबे वाटेत भेटतात; तर कुठे कातळाला पाझर फुटून नुसतंच पाणी ठिबकत असतं. वाटेतच धुक्‍याच्या ढगाआडून पाऊस अचानक चाल करून येतो, तेव्हा चांगलीच गाळण उडते. समोरचा रस्ता दिसेनासा होतो. सोसाट्याचा वारा सुटलेला असतो. वाऱ्याच्या झंझावाताने तोल जाऊन शेकडो फूट दरीत कोसळण्याची भीती असते.गडावर पोचलं, की दृष्टीस पडतो हिरवाकंच शालू नसलेली तांबडी माती आणि नागमोडी पायवाट, काळ्या दगडांनी केलेलं बांधकाम. "अदभुत!' असेच शब्द मुखातून बाहेर पडतात. "खूब लढा बुरूज', "दोन- नाणे' (नाना) दरवाजा, गंगासागर, टकमक टोक, नगारखाना, राण्यांचे महाल, अष्टप्रधान मंडळाची जागा, राजदरबारातील उठबस असणाऱ्या व्यक्तींसाठी असलेला "मीना दरवाजा', महादरवाजा, जगदीश्‍वराचं मंदिर हे सारं पाहिलं, की शिवकालीन देदीप्यमान इतिहासाची पानं डोळ्यांसमोरून झपाझप उलटतात. भोवळ आणणारा हिरकणी कडा पाहिला, की त्या माऊलीच्या धाडसानं मन थक्क होतं. महाराजांचा दरबार आणि त्यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा पाहिला, की छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा कल्पनेनं नजरेसमोर उभा राहतो अन्‌ ऊर अभिमानानं भरून येतो. गडावर फिरताना पावलोपावली भग्न अवशेषांना, दगडांनाही शब्द फुटतात अन्‌ ते शिवरायांची विजयगाथा सांगतात. इतिहास बोलका होतो. शिवराय आज नसले तरी त्यांचं स्थान एकविसाव्या शतकातही प्रत्येकाच्या हदयात कोरलेलं आहे. म्हणूनच अजूनही ऊन-पावसातही मराठी मनं रायगडाची वाट तुडवीतच असतात...
- योगेश पवार

Monday, May 23, 2011

ओसामाचा फ्रेंड ओबामा



दृष्य -1



गण्या झोपला आहे. त्याला स्वप्न पडले आहे. (स्वप्नात - ओसामा बिन लादेन आणि बराक ओबामा एकमेकांशी भांडताना दिसतात.)



गण्या स्वप्नातून खडबूडन जागा होतो. आळस काढतो.



दृष्य -2

दारूचा अड्डा दोघेजण दारू पित आहेत.

गण्या : अरे मी आज ओसामा बिन लादेन पाहिला. आपल्या गावात लपला आहे तो.

मन्या : अरे तुला चढलीय साल्या. बस कर आता !

गण्या : हात तुझ्या आयला ! अजून गलास तोंडाला पण लावले नाय. मी खरं सांगतोय ओसामा गावात आलाय आणि त्याला शोधायला ओबामा पण आला आहे.

मन्या : आसल आसल तु सांगतोयस तर मग आलाच आसल..

....

स्पॉट -1

पाणी भरणाऱ्या महिलांची चर्चा

पहिली : अग ऐकलस काय ? तुला माहितीय तो ओसामा की फोसामा आपल्या गावात लपलाय म्हणे.

दुसरी : अग बाई खरच. आमचे हे सुध्दा काल आसच काही तरी सांगत व्हते. डोंगऱ्यांच्या अड्यावर काल ओसामाचीच चर्चा व्हती. ओसामाच्या भीतीन काल संगळ्यांची जागच्या जागी उतरली म्हणे.

पहिली : मला तर बाई खूप भ्या वाटतय. मेला एकडं कुठ आला तडमडायला ऐवढ्या लांब.

दुसरी : बघ ना . हलकट मेला. आग पण तो ओबामा पण आलाय ना त्याच्या मागावर

पहिली : ओबामा हा आणि बामा कोण जळला ?

दुसरी : अग तो अमेरीकेचा राष्ट्राध्यक्ष नाय काय. काय मेल्याचं नाव चांगलच तोंडावर हाय....पण येत नाय बग.... हा आठवलं.... बराक ओबामा.

............

स्पॉट लाईट : 2

सुतारकाम सुरू आहे.दोघे जण रंधा मारताहेत.

पहिला : अरं गावाची पाचावरधारन बसली हाय लेकानू.

दुसरा : (काळजीच्या सुरात) का काय झालं. काय भानगड झाली काय ?

पहिला : लेका हायस कुठं. अरं एवढा मोठा दहशतवादी गावात घुसलाय आन्‌ तूला खबर नाय. हात तुझ्या.

दुसरा : काय म्हनतोस दहशतवादी . बापरं ! मेलव आता आपून. अपणास पन तो घन मशीनच्या गोल्या घालणार आता.

पहिला : आरं नुसत्या घन मशीनच्या गोल्या नाय. तर इमानं पण पाडून घालतो तो घरावरनी

दुसरा : अरं पण तो लपलाय तरी खय

पहिला : कोण म्हणत व्हता . पात्रादेवीत पाहिला तर कोण म्हणे एक लांब दाढीवाला हातात काठी व खांद्यावर धनगरावानी शाल पांघरून घन मशीन लटकवलेला बाप्या बघिटला.

दुसरा : बाप रं ! तो- तो असोमा आसनार .काल गावावरनं दोन इमान पण घरघरत गेली व्हती आता आपलं काही खरं नाय.



स्पॉट -3

शाळेतील मुले

पहिला : बाईंनी सांगितलय गुमान सरळ घरला जायचं, इकडं तिकडं कुठं बी भटकायच नाय.

दुसरा : बाई म्हनल्या कोणी दाढीवाला माणूस दिसला तर त्याच्या जवल जायचं नाय.त्यानं काही दिलं तर खायच बी नाय.

पहिला : बाई म्हणत हूत्या दहशतवादी घुसलाय गावात. बाईंची पण जाम टरकली हाय.

......

दृष्य - 4



गावाची मिटींग बसते. ( रितसर सुरवात होते.)

अध्यक्ष : तर मंडळी गावात "ओसामा' आल्याची खबर हाये.

(मिटींगमध्ये महिला व पुरूषांमध्ये भिती युक्त कुजबुज होते)

अध्यक्ष : शांत रहा मंडळी. आपापासात चर्चा नको. आपल्या गावावर संकट आलय.ओसामा पासून आपल्या गावाला धोका होता नये.

एकजण : होय अध्यक्षानू बराबर हाय

अध्यक्ष : आपण गावांन ओसामाला धरायचं आणि त्याला शोधायला आलेल्या ओबामाला पण धरायचं. गावाच्या येशी बाहेर जाऊन काय ते एकमेकांच्या मानेवर बसा म्हणाव., आधी गळ्यात गळे घातले आणि आता एकमेकांच्या जीवावर उठलेत. आमच्या गावात खुन खराबा नको. ठरल तर दोघावांनाही गावानं धरायचं. तेव्हा सावध रहा . लांब रूंद जाऊ नका. दोघांची खबर कळताच आम्हसनी कळवा. ....................



दृष्य - 5



अंगणात दोघेजण गप्पा मारत असतात. तेवढ्यात घरातून हाक येते.ओसामा आणि ओबामा जेवायला चला. दोघे आलो म्हणत घरात जातात. ही हाक रस्त्याने जाणारा एक जण ऐकतो.

दृष्य : 6

गावकरी आणि पोलीसांनी घरातील ओसामा आणि ओबामाला पकडलं आहे. (दोघांचे लुक वेगळे आहे.)

पोलीस : ओसामाकडे पाहून काय रे ! दाढी केलेली दिसतेय . न्हावी भेटला वाटतं तुला

वेश पालटून राहतोस काय गावात. अरे जगाला गंडवलस तरी या रत्नागीरीचे पोलीस तुला सोडणार नाहीत. समजलास काय तु आम्हाला.

(पोलीस : ओबामाकडे वळून) आणि काय ओबामा साहेब . असाल अमेरीकेचे अध्यक्ष पण आपल्या एरीयात ना चालयची दादागीरी. आणि काय रे ओसामाला पकडायचे नाटक करतो आणि इंथ गळ्यातगळे घालता. लाज नाही वाटत.

(दोघे ही घाबरून ) साहेब आम्ही ते नाहीत.सोडा आम्हाला

पोलीस : काय रे येडा समजला काय .

पहिला : साहेब माझे खरं नाव ओबामा नाही. तो माझ्या नावाचा शॉटफॉम आहे.

पोलीस : ही काय नवी भानगड आता. सरळ बोला नाही तर फटकेच टाकतो तुम्हाला.

पहिला : साहेब माझे नाव ओमकार बाळकृष्ण मांजरेकर मला माझे सगळे मित्र "ओबामा' असे शॉर्टफॉम मध्ये हाक मारतात.

आणि साहेब मी पण ओसामा नाही. माझे नाव ओमकार सागर मालवणकर आहे. सारे माला शॉर्टफॉम मध्ये ओसामा हाक मारतात.आणि मी ओबामाचा सॉरी ओमकार मांजरेकरचा मित्र आहे. (सारे जण एकदम खळखळून हासतात.)

पोलीस : कपाळावर हात मारून घेतो

तेवढ्यात एक हवालदार धावत येतो... साहेब खरा ओसामा बिन लादेन आपल्या गावात नाही . तो पाकिस्तानातील एका गावात लपला होता. अमेरीकेनं मारला त्याला टीव्हीवर दाखवतायत बघा.



Saturday, February 26, 2011


खेळ मांडला, खेळ मांडला
आज इथं हा खेळ मांडला हो !!

तर मंडळी मी अंडेराव , आपले सहर्ष स्वागत करतो.
( शेजारी उभा असलेला दंडेराव त्याला लाथ मारतो.)
सॉरी सॉरी च्यायला विसरलोच बघा. तर मंडळी हा माझा जोडीदार दंडेराव
आम्ही दोघंही आपलं स्वागत करतो.
मंडळी आमच्या आयुष्याचा मंत्र आहे.
( ढोलकीवर थ्री इडियटस्‌ या गाण्याच्या चालीवर)

'जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल
तो देवाकडे करून बोट
देवाकडं करून बोट भरतोय आम्ही आपलं पोट
या पोटामध्ये आहे सगळा काळा माल
राजकारणी मुजोर झालेत मालामाल
(सगळे गातात) अहो आजी... आल इज वेल
अहो तात्या.... आल इज वेल
रे बाबू.... आल इज वेल...'

( विषयाला सुरूवात होते. )
अंडेराव : आल इज वेल ... वेल म्हणजे काय रं दादा ?
दंडेराव : अरे येड्या वेल म्हणजे चीबडाची वेल नाय... वेल म्हणजे चांगले !
अं - वेल म्हणजी चांगलं मग इथ कुठं काय चांगलं हाय रे गड्या
दं -  अरे देवा नारायणा... वाचवरे
( त्याचवेळी एक पात्र पुढे येते, दारू पिऊन तराट झालेल्या अवस्थेत )
हा बोला कुणी हाक मारली... नारायण दगडफोड्या म्हणतात मला... आपल्याला कुणाची टच करायची  हिंमत नाय ... ( अंडेरावकडे बघत) चल जाऊया डोंगऱ्याकडं, पावशेर देणार काय ?

सूत्रधार (पुढे येतो) : बघा लोक हो ... घरात जेवायला काही नाही... बायको पोरं उपाशी मरतायत आणि याची गाडी दिवसरात्र घेरमध्ये
सूत्रधार : अरे नारायणा दारू म्हणजे तुला काय कोकम सरबत वाटला काय ?
नारायण : ये दारूला सरबत काय म्हणतो येड्या... (सुत्रधाराच्या तोंडाचा वास घेत ) तू पण घेतलीस काय ? अरे दारू म्हणजे 'दो बूँद जिंदगी के" आम्हाला घ्यायलाच लागतात.
सूत्रधार : वर तोंड करून बोलतोस. तुला काय लाज -
नारायण - नाय बा.
तुला काय लज्जा - नाय बा ,
शरम - नाय बा
हाय तरी काय तुला - स्टॅमिना हाय ना ! दोन कॉटर मारतो रोज. एकदम टॅंकर हाय
सूत्रधार - तुझा मुलगा शाळत जातो - व्हय बा
त्याच्या भवितव्याचा काय इचार केलास - नाय बा
बायको - हाय ती जिती हाय
तू काम काय करतोस : काय खणीवर जातो...दगड काढतो. हातावर पैशे घेतो. संध्याकाळी येताना डोंगऱ्याकडं जातो पावशेर मारतो. नि घरी येतो...
(घरातले दृष्य - बायको डोक्‍याला हात लावून चुली जवळ बसलेली असते.)
(नारायण मागे वळून)
नारायण : ये बायकू जेवायला वाढ
बायको : मसण्या जेवायस कुठून वाढू ...दोन दिवसापासून घरात अन्नाचा दाणा नाय...बाब्याची शाळेची फी भरायची राहलीय. जेवान कठून आणू ...दारू पिऊन कशाला येतो तुझ्या दारवेला लागली आग ती..
( नारायण रागाने बायकोच्या अंगावर धावून जातो..)
ये रांन्डे लय थोबाड वाजतय तुझं ... तुझ्या मायची....( तो बायकोला मारायला जातो तेवढ्यात पोरगा मध्ये धावून जातो)
पोरगा : ये बाबा आयेच्या अंगाला हात लावायचा नाय... दोघेही झटापट सुरू होते.) - दृष्य फ्रिज होते.

सूत्रधार - पाहिलात मंडळी 'घर घर की हीच कहाणी हाय'. अहो घरात बायको पोरं उपाशी मरत असली तरी यांना दारू लागते... दिवसभर मेहनत करायची आणि संध्याकाळी मेहनतीचा पैसा डोंगऱ्याकडं दारूत उडवायचा. अहो विशी पंचविशीतली पोरं त्या दारूच्या गुत्यावर आपलं आयुष्य जाळत असतात...दारू आयुष्याचं वाटोळं करते हो वाटोळे सावध व्हा ! जीवन बरबाद करायचं की, स्वतः:चं नाव काढायच. तुम्हीच ठरवा !


दृष्य- 2
खंगलेल्या अवस्थेतला एक तरुण खोकत खोकत पुढे जातो.... एक किंकाळी एकू येते (तो आत्महत्या करतो.)
(तरुण जातो त्या दिशेनं दोघं जण चालत येतात )
1 - खूप चांगला पोरगा होता. पाच वर्षापूर्वी मुंबईत गेला होता. एका कंपनीत कामाला पण होता चांगला.
गावाकडं महिन्याच्या महिना पैसा पाठवीत होता. गेल्या वर्षी आजारी पडला. गावात आला तेव्हा कळलं त्याला एड्‌स झाला होता.
2 - अरे वाईट नादाला लागला असलं...
1 - अरं बाबा एड्‌स काय फक्त वेशेकडे गेल्यानंच होतो असं नाय.
एचआयव्ही बाधित दूषित रक्त अंगात चढवल्यानं, इंजेक्‍शनची एकच सुई सगळ्यांना वापरल्याने असुरक्षित संबंधातून पण हा रोग होतो. आई वडील एचआयव्ही बाधित असतील तर पोटातल्या पोराला पण होऊ शकतो... म्हणून लोकांनी अशा लोकांना समजून घेण गरजेचं हाय.
2- होय खरय गड्या तुझं...या पोराल घरातल्यानी समजून घेतलानी नाय. ते घाबरले त्यांना वाटलं आपल्याला पण एड्‌स होईल म्हणून त्याला अक्षरशः: कोंडून ठेवलं...आणि आता त्यानं आयुष्य संपवलं तर रडतायत.

सूत्रधार : पाहीलंत ही परिस्थिती आज कोणावरही येऊ शकते. तेव्हा प्रत्येकानं काळजी घ्याला हवी. 'नाही लस नाही उपचार प्रतिबंध हाच आधार". हा रोग संसर्गजन्य नाय. त्यामुळे अशा रुग्णांना पण समाजानं .घरातल्या लोकांनी समजून घ्यायला हवं...त्यांना माणसासरखी वागणूक द्या.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लग्नापूर्वी पत्रिका नाही बघितली तरी चालेल. पण एचआयव्हीची टेस्ट मात्र करून घ्यायाला विसरू नका. टेस्ट पूर्णपणे सुरक्षित व गुप्त ठेवली जाते. उद्याचा प्रसंग टाळण्यासाठी आजच व्हा सावध !

दृष्य तिसरे
एक जण ओरडतो अरं नळाला पाणी आलं.. मग एकच गलका होतो. सगळे जण हंडा कळश्‍या घेऊन नळाकड्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌धाव घेतात.पाणी भरण्यासाठी प्रत्येकाची गडबड उडते ...ढुसाढुशी सुरू होते. एक जण ओरडतो अरे चार चार हांडे घ्या पण कोणीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नसते. भांड्याला भांडी आपटतात. दोन बायकात भांडण जुंपतं ..शिव्यांची लाखोली एकमेकांना वाहतात...मारामारी होते. बायकांची मारामारी बघून पुरुष ही घुसतात. हाणामारी सुरू होते
(दृष्य फ्रिज )

सूत्रधार : बघा मंडळी हे आपल्या वाडीत वस्तीत रोज दिसणारं चित्र. विहीरीतल, बावडीतलं पाणी आधी बेसुमार उपसायचं आणि उन्हाळा आला की, पाण्यासाठी एकमेकांची डोकी फोडून लालपाणी काढायचं.
गेल्या पावसाळ्यात पुरातल्या पुलावरनं पाणी गेलं. पाहिजे तर त्या मदनला विचारून बघा.
बोंडगीची दगड बुडाली येवढा हौर गेला. आणि आता प्यायला पाणी नाही.
ंडळी हे किती वर्ष असं चालायचं. पावसाचं वाहून जाणारं पाणी बंधारे बांधून, शेततळी बांधून आपण कधी अडवणार. बेसुमार झाडं तोडल्यानं जमिनीची धूप होते. नदी नाले गाळाने भरले आहेत. लोकहो पाणी आडवा... पाणी जिरवा...गाव वाचवा..

(दृष्य चौथे )
एसटी स्टॉपवर एक तरुण एसटीतून उतरतो. त्याच्या हातात सुटकेस असते. ) दोघे जण उत्सुकतेने त्याच्याकडे जातात.
1 - अरे पांडबाचा इलास ना तू ? मुंबैत असतोस ना ?
विलास : होय ! पण आता मी गावात आलोय कायचा राहायला.
2 - का तुला बी काय आजार झाला काय ?
विलास : तसलं काही नाही. मुंबईत चार पाच हजाराची नोकरी करण्या पेक्षा. गावातील तरुणांना एकत्रित करून शेती किंवा एखादा लघू उद्योग करायचं ठरवलं आहे मी. गावातल्या पोरांनाबी काम मिळेल. सहकार रूजला पायजे बघा आपल्याकडं. 'एक मेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ'
सूत्रधार : (आनंदाने) नारायणा... नारायणा
लगेचच (पहिल्या दृष्यातील नारायणाचे पात्र) हो आलो... आलोच. मीच तो नारायण. ओळखलंत नाय अहो पयल्या भागात भेटलो नव्हतो का आपण. तेव्हा मी घेरमध्ये होतो. आता मी पीत नाही. दारू सोडली अजिबात..घरात येळच्या येळी पैसा देतो. बाब्याच्या शाळंची फी, भरलीय, बचत करतो. बायको पण खूष संसार कसा झाकास चाललाय माझा.
(तिथून एक तरूण जात असतो.)
सूत्रधार : अरे गणपत कूठ निघालास ?
गणपत : लांज्याला जाऊन येतो सरकारी रुग्णालयात. एचआयव्ही ची टेस्ट करून येतो. महिनाभरानं लग्न ठरवायचं आहे. त्याच्या आधी टेस्ट करून घेतो. नंतर वांद नको.
(काही गावकरी खांद्यावर कुदळ फावडी घेऊन निघालेली असतात सूत्रधार त्यांना हाक मारतो)
गावकऱ्यांनो कुठं निघालात कुदळ फावडी घेऊन.
1 - आम्ही बंधारा बांधायला जातोय. यावर्षी पावसाचं पाणी अडवायचं ...जमिनीत जिरवायचं असा आम्ही निर्धार केला आहे.
2 व 3 - व्हय आम्हाला आता टॅंकर मुक्त गाव करायचं आहे.झाडं लावणार .गाव हिरवागार करणार.

सुत्रधार: तर मंडळी आमचं गाव आता सुधारतं आहे. आम्हाला खूप खूप आनंद वाटला . आता आम्हाला निरोप घ्यायला हवा मंडळी.

(सारे एकत्रित गाऊ लागतात)

वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी...

.........................